शर्थीने खिंड लढवली

इयत्ता - चौथी.



प्र १) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) सिद्दी जौहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला.

२) बाजीप्रभूची स्वामिनिष्ठा बघून शिवराय गहिवरले.

३) घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली.

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला? 

शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला निरोप पाठवला की, ' लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो.'

२) सिद्दी जौहर का चवताळला ?

शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याची लक्षात येताच सिद्दी जौहर चवताळला.

३) विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले ?

विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले,   " बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला, शत्रूला उलटून तोंड देऊया ! "

प्र ३) दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली ?

पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार होते. दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार होती. दुसरी पालखी शत्रुसैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी महाराजांना पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार होते. अशी युक्ती योजली.

२) बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली ?

बाजीप्रभूंनी आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड, गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार  झाली. अशी बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी योजना आखली.

प्र ४) कारणे लिहा.

१) आदिलशाहा भयंकर चिडला.

अफजलखानाच्या वधामुळे  विजापुरात हाहाकार उडाला. त्या मागोमाग शिवरायांनी विजापूरच्या ताब्यात असलेला  पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला.

२) शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशिद अमर झाला.

पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी जी योजना ठरली होती. त्यानुसार शिवा काशिद एका पालखीत बसून राजदिंडी दरवाजातून बाहेर पडला. त्याची पालखी शत्रूंने पकडली. थोड्यावेळाने शिवा काशिदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्दीने संतापून शिवास तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशिद ने आत्मबलिदान केले. म्हणून शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशिद अमर झाला. 

३) पावनखिंड इतिहासात अमर झाली.

शिवराय विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत अतुलनीय पराक्रम केला होता व शत्रूला खिंडीतून वर येऊ दिले नव्हते. याच खिंडीत स्वराज्यासाठी बाजीप्रभू धारातीर्थी पडले. बाजीप्रभू सारखे देशभक्त होते. म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणून पावनखिंड इतिहासात अमर झाली.

प्र ५) कोण ते लिहा.

१) शूर पण क्रूर होता. - सिद्दी जौहर

२) घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे. - बाजीप्रभू देशपांडे

३) वेढ्यातून निसटून जाणारे. - शिवराय